Ticker

6/recent/ticker-posts

कोथळ्याचा भैरवगड / बहिरोबागड / कोथळे किल्ला / Bhairavgad / Kothale fort

कोथळ्याचा भैरवगड / बहिरोबागड / कोथळे किल्ला / Bhairavgad / Kothale fort


महाराष्ट्रात भैरवगड नावाचे किल्ले जवळपास ५ पेक्षा देखील जास्त आहेत. यात भर म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातच दोन भैरवगड आहेत त्यातील एक म्हणजे शिरपुंज्याचा भैरवगड  आणि  दुसरा म्हणजे कोथळ्याचा भैरवगड होय.

किल्ल्याचे नाव- कोथळ्याचा भैरवगड, bhairavgad, kothale fort


समुद्रसपाटीपासूनची उंची- १०६३ मी

किल्ल्याचा प्रकार- गिरिदुर्ग

चढाईची श्रेणी- मध्यम

ठिकाण- कोथळे गावासमीप, राजूर, अकोले

जिल्हा- अहमदनगर

सध्याची अवस्था- व्यवस्थित

किल्ल्याला भेट द्यायला कसे जाल?

आपण दोन मार्गांनी या गडावर येऊ शकता. जर तुम्ही ओतूर ला आलात तर तिथून ३० कि.मी. अंतरावर कोतूळ गाव लागेल, येथून आपण विहीर गावातून म्हणजेच कुंजरगडाच्या पायथ्याच्या गावाजवळून कोथळे या गावात पोहोचतो. हे अंतर साधारणतः २५ कि. मी. च्या आसपास आहे.

जर आपण भंडारदरा बघून राजूर ला आलो तर राजूरहून कोतूळ कडे जाणाऱ्यामार्गावर आपल्याला ४१ कि.मी. अंतरावर कोथळे गाव लागते. बस ने देखील हा प्रवास होऊ शकतो.

गडावर जाताना घ्यावयाची काळजी-

हरिश्चंद्रगड हा या भागातील महत्वाचा किल्ला असल्याने त्याकडे जाणारा मुख्य मार्ग हा टोलारखिंडीतून जातो, या मार्गावर राखण करण्यासाठी म्हणजेच टेहाळणी साठी हा भैरवगड बांधलेला असावा. खिंडीच्या एका बाजूला नगर कडून कोथळे तर पुण्याकडून खिरेश्वर गाव आहे.

कोथळे गावात आल्यावर डोंगराचीसुरुवात होते. सर्वात वेगळा आणि छोटा परंतु शिवलिंगासारख्या आकाराचा एक डोंगर दिसतो त्याला कोथळा नावाने संबोधले जाते. पुढे एक शिखर सोडून सपाट असा पठार आहे तो म्हणजे "भैरवगड" आणि त्याच्या लगतचे उंच शिखर म्हणजे "गाढवाचा डोंगर" होय.

कोतुळ गावातून कोथळे कडे जाताना कोथळे गावाच्या साधारणतः अर्धा किलोमीटर अगोदर आणि जर राजूर कडून आलात तर कोथळे गावाच्या पुढे एक कच्चा रस्ता टोलार खिंडीकडे जाणार रस्ता आहे. इथे हरिश्चंद्रगड, कळसुबाई अभयारण्य असे फलक आहेत आणि टोलार खिंडीकडे असा बाण देखील दाखवलेला आहे. रस्त्याने पुढे गेल्यावर दोन मिनिटांनी डाव्या हाताला शेतातून मळलेल्या पायवाटेने पुढे जाणार रस्ता आपल्याला दिसतो.

आपला प्रवास गडावर सुरू होतो गर्द झाडीतून जाणाऱ्या वाटेने! कितीही थकवा असला तरी झाडांच्या या गर्दीतून तो नक्की नाहीसा होतो.

एक २० मिनिटांच्या आल्हाददायक पण खड्या चढाई नंतर आपण गडाच्या पहिल्या कातळकोरीव टप्प्यावर पोहोचतो. या पायऱ्यांच्या डाव्या बाजूला पाण्याचे कातळाखाली एक टाके आहे. हे पाण्याचे टाके बघून आपण पुढे एक वळसा घालून गडाच्या पहिल्या शिडीजवळ येतो.

थोडंस अंतर चालून गेल्यावर आपल्याला कातळकोरीव खांब टाके लागते. खांब टाक्यातील पाणी हे पिण्यायोग्य असते. खांब टाक्याच्या बाजूला खाली एक बुजलेल्या अवस्थेतील पाण्याचे टाके आहे. वनविभागाने या जागेवर दोन बाक टाकलेले आहेत.

टाक्यापासून पुढे गेल्यावर आपल्याला एक मोठी शिडी लागते. ही शिडी काही प्रमाणात हालत आहे. आधार नसल्याने ही ४० पायऱ्यांची शिडी एकट्यानेच चढावी. ही शिडी चढून गेल्यावर शेवटची छोटी शिडी आपण चढून जायची.

गडमाथ्यावर गेल्यावर गडाचा छोटा विस्तार लक्षात येतो. गडाच्या उत्तरेला म्हणजेच आपल्या उजव्या हाताला भैरवनाथाचे उघडयावर मंदिर आहे. बाजूलाच काही वीरगळ व मुर्त्या आहेत. समोरच कातळकोरीव दोन पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे. भैरवनाथाच्या मूर्तीच्या उजव्या हाताला दोन दीपमाळा आहेत.



भैरवनाथाच्या मागच्या बाजूला लोखंडी रेलिंग लावलेले आहेत तिथून आपल्याला हरिश्चंद्रगडाच्या वेताळधारेचे रूप दिसते.

भैरवनाथाचे दर्शन घेऊन आपण गडाच्या दक्षिण भागाकडे जायचे. दक्षिणेकडे आपल्याला एक उंच शिखर दिसते. गावकऱ्यांनी एक श्रद्धेने याला गाढव डोंगर म्हणाले आहे. भैरवगड हा भैरवनाथाचा रथ आहे तर हा रथ ओढणारा गाढव आहे अशी अदभुत कल्पना केलेली आहे. गडाच्या दक्षिणेला पाण्याची पाच टाकी आहेत. गाढव डोंगर आणि भैरवगड जिथे एकत्र येतात तिथे आपल्याला तटबंदीचे काही अवशेष बघायला मिळतात, ते बघून आपली गडफेरी पूर्ण होते.


इतिहास-

गडाला तसा काही इतिहास नाहीये पण टोलार खिंडीच्या मार्गावर देखरेखीसाठी हा गड वापरला असावा असे वाटते.

गडावरील वास्तूंची रचना ही हरिश्चंद्रगडाच्या सारखीच आहे. त्यामुळे हा गड देखील हरिश्चंद्रगड सोबत बांधलेला असावा असे वाटते.

राहण्याची व जेवणाची व्यवस्था-

गडावर राहण्याची व्यवस्था नाहीये. कोथळे गावात मंदिरात आपली १० जणांची व्यवस्था होऊ शकते. जेवणाची व्यवस्था स्वतःला करावी लागेल.
किंवा शेजारील पाचनई गावात तुम्ही जाऊ शकता. तिथे व्यवस्था होईल.

Post a Comment

1 Comments