Ticker

6/recent/ticker-posts

महाराजांची शेतकऱ्यांविषयी दक्षता दर्शवणारे पत्र

महाराजांची शेतकऱ्यांविषयी दक्षता दर्शवणारे पत्र

महाराजांची शेतकऱ्यांविषयी दक्षता दर्शवणारे पत्र

गरीब शेतकऱ्यांना काडीचाही त्रास सैनिकांकडून होऊ नये म्हणून महाराज किती दक्ष असत ते या पत्रावरून दिसून येते. शिवाजी महाराज हे खरोखर लोकांचे राजे होते, त्यांनी स्थापन केलेले स्वराज्य हे लोककल्याणासाठी होते. ही गोष्ट पुन्हा एकदा सिद्ध करण्यास हे पत्र पुरेसे आहे. तुमच्यासमोर ते पत्र आणि अर्थ आज आणतो आहे.

पत्र हे शके 1593 रोजी वैशाख पौर्णिमेला लिहिले गेले आहे. याच दिवसाची इंग्रजी तारीख ही 19 मे 1673 होते. पत्राच्या मथळ्यावर "श्री भवानीशंकर" उल्लेख करून महादेवाचे स्मरण केलेले आहे. 

मशरुल अनाम राजश्री जुमलेदाराणी व हवालदारानी व कारकुनानी दिमत पायगो मुक्काम मौजे हलबर्ग(दळवटने) ता। चिपळूण मामले दाभोळ प्रति राजश्री शिवाजी राजे सु।। अर्ब. सवैन व अलफ. कसबे चिपळुणी साहेबीं लष्कराची विले केली आणि याउपरी घाटावरी कटक जावे ऐसा मान नाहि. म्हणून एव्हा छावणीस रवाना केले. एसीयास चिपळुनी कटकाचा मुक्काम होता.  यांकरता दाभोळाच्या सुभियांत पावसाळ्याकारणें पागेस सामान व दाणा व वरकड केला होता तो कितेक खर्च होऊन गेला. व चिपळूण आसपास विलातींत लष्कराची तसविंस व गवताची व वरकड हर एक बाब लागलीं. त्याकरितां हाल काहि उरला नाही. 

ऐसें असता वैशाखाचे वीस दिवस, उनाळा, हे हि पागेस अधिकच. बैठी पडली, परंतु जरूर जालें त्याकरिता कारकुणाकडून व गडोगडी गल्ला असेल ते देववून जैसी तैसी पागेची बेगमी केली आहे. त्यास, तुम्हि मनास आणाल ऐसा दाणा, रतीब, गवत मागाल, असेंल तोवरी धुंदी करुनि चाराल, नाहीसे जाले म्हणजे मग काहीं पडत्या पावसात मिळणार नाही, उपास पडतील, घोडी मरावयास लागतील. म्हणजे घोडी तुम्हीच मारीली ऐसे होईल व विलातीस तसवीस देऊ लागाल. ऐशास लोक जातील, कोण्ही कुणब्याचे येथील दाणे आणील, कोण्ही भाकर, कोण्ही गवत, कोण्ही फाटे, कोणी भाजी, कोण्ही पाले. ऐसें करू लागलेत म्हणजे जी कुणबी घरं धरून जीवमात्र धरून राहिलें आहेत तेही जाऊ लागतील. कितेक उपाशी मरायला लागतील. म्हणजे त्याला असे होईल कीं मोंगल मुलकांत आलें त्याहूनही अधिक तुम्हीं! ऐसा तळतळाट होईल, तेव्हा रयतेची व घोडीयांची सारी बदनामी तुम्हांवर येईल! हे तुम्ही बरे जाणून, सिपाही हो अगर पावखलक हो, त्याणी रयतेस काडीचा अजार द्यावया गरज नाहीं.  साहेबीं खाजाणांतुन वाटण्या पदरी घातलीया आहेती. ज्याला जे पाहिजे, दाणा हो अगर गुरेंढोरे वागवीत असाल त्यांस गवत हो, अगर फांटे, भाजीपालें व वरकड विकावया येईल ते रास घ्यावे, बाजारास जावे, रास विकत आणावे. 

कोन्हावरी जुलूम अगर ज्याजती अगर कोन्हासी कलागती करावयची गरज नाही. पागेस सामान केला आहे तो पावसाळा पुरला पाहिजे. ऐसे तजविजिने दाणा रतीब कारकून देत जातील तेणेंप्रमाणे घेत जाणे, कीं उपास न पडता रोजबरोज खायाला सांपडे आणि होत होत घोडीं तवाना होत ऐसें करणे. नसतीस कारकूनासी धसपुस कराया , अगर अमकेच द्या तमकेचं द्या ऐसे म्हणाया, धुंदी करून खासदारकोठीत, कोठारांत शिरून लुटाया गरज नाही व हालीं उन्हाळ्याला आहे तैसें खलक पागेचे आहेत. खण धरून राहिले असतील व राहतील, कोण्ही आगट्या करतील, कोण्ही भलतेच जागी चुलही, रंधनाळा करतील, कोण्ही तंबाखुला आगी घेतील, गवत पडिले आहे ऐसे मनास ना आणिता म्हणजे अविस्त्राच एखादा दगा होईल. एका खणास आगी लागली म्हणजे सारें खण जळो जातील. गवताच्या लहळ्यास कोणीकडून तरी जाऊन विस्तो पडला म्हणजे सारे गावात लहळ्या एक एक जळोन जातील, तेव्हां मग काही कुणबीयांच्या गर्दना  मारल्या अगर  कारकुनांस ताकीद करावी तैसी केली तरी काही खण कराया एक लाकूड मिळणार नाही. एक खण होणार नाही, हे तो अवघियांना कळते. या कारणें, बरी ताकीद करून, खासेखासे असाल ते हमेषा फिरत जाऊन, रंधने करिता, आगट्या जाळीता, अगर रात्रींस दिवा घरात असेल, अविस्त्राच उंदीर वात नेईल, ते गोष्टी न हो. आगीचा दगा न हो. खण, गवत वांचेल ते करणे. म्हणजे पावसाळा घोडी वाचली. नाहीतर मग, घोडीचं बांधावी न लगेत, खायास घालावे नलगे, पागाच बुडाली! तुम्ही निसुर जालेत ऐसें होईल!  

याकारने तपशिले तुम्हांस लिहिले असें. जितके खासें खासे जुमलेदार, हवालदार, कारकून आहा तितके हा रोखा तपशिलें ऐकणे, आण हुशार राहाणें वरचेवरी, रोजचा रोज खबर घेऊन ताकीद करून, येणेप्रमाणे वर्तणूक करितां त्यापासून अंतर पडेल, त्याचा गुन्हा होईल. बदनामी ज्यावर येईल त्यास मराठीयाची तो इज्जत वाचणार नाही, मग रोजगार कैसा? खळग समजो, जास्ती केल्यावेगळ सोडणार नाही. हे बरे म्हणून वर्तणूक करणे. र छ १२ सफर. 


हे पत्र राजवाडे खंड ८, लेखांक २८ म्हणून छापण्यात आले आहे. शिवाजी महाराजांचे हे पत्र अतिशय महत्वपूर्ण आहे, त्यांच्या राजनीतीवर उत्तम प्रकाश टाकणारे आहे. सामान्य शेतकऱ्याविषयी रयतेवीषयी महाराजाना किती कळकळ होती हे या पत्रातील प्रत्येक ओळीतून स्पष्ट होते. 


शब्दांचे अर्थ:

पायगो- फौज

दळवटने- चिपळूण जवळील गाव

विले केली- व्यवस्था नेमून दिली

रतीब- रोजचा खुराक

पावखलक- पायदळातील लोक 

ज्याजती- म्हणजे जुलूमच

तवाना करणे- सशक्त करणे

रंधने- अन्न शिजवणे

निसुर- निष्काळजी

Post a Comment

0 Comments