Ticker

6/recent/ticker-posts

शिवप्रतापाचा साक्षीदार किल्ले प्रतापगड (Pratapgad Fort)

शिवप्रतापाचा साक्षीदार किल्ले प्रतापगड (Pratapgad Fort)

किल्ले प्रतापगड (Pratapgad Fort)

छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य साकार करण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने केलेले न भूतो न भविष्यती असे धाडसी पराक्रम आजच्या पिढीला देखील प्रेरणादायी ठरतात. या सर्व घटना ऐकत असताना किंवा वाचत असताना आपल्या अंगावर ती शहारे आल्यावाचून राहत नाही. महाराजांच्या पराक्रमाने पैके सर्वात अविस्मरणीय असा प्रसंग म्हणजे बलाढ्य अशा अफजलखानाचा वध म्हणजेच शिवप्रताप! यात शिवप्रतापाचा साक्षीदार ठरलेल्या किल्ले प्रतापगड विषयी आपण आज माहिती घेणार आहोत.

किल्ल्याचे नाव- प्रतापगड (Pratapgad)

समुद्रसपाटीपासून उंची- 1080 मीटर

किल्ल्याचा प्रकार- गिरिदुर्ग

चढाईची श्रेणी- सोपी

ठिकाण- महाबळेश्वरच्या पुढे वाडा कुंभरोशी 

जिल्हा- पुणे

सध्याची अवस्था- ठीक

किल्ल्याला भेट द्यायला कसे जाल?

किल्ले प्रतापगड (Pratapgad Fort)

महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण असलेले पर्यटनकांचे आकर्षण म्हणजे महाबळेश्वर! सह्याद्रीच्या गिरीशिखरांमध्ये घनदाट वृक्षराजीत वसलेले महाबळेश्वर तेथील असंख्य पर्यटन स्थळांसाठी प्रसिद्ध आहे. येथून जवळपास 21 किलोमीटर अंतरावर प्रतापगड आहे.महाबळेश्वर बस स्थानकावरून आपल्याला प्रतापगडाच्या पायथ्याच्या वाहनतळावर जाणारी बस मिळेल. थेट बस न मिळाल्यास आपण वाडा कुंभरोशी गावापर्यंत बसणे येऊन तेथून तासाभरात जुन्या शिवकालीन पायर्‍यांच्या सहाय्याने प्रतापगड गाठू शकतो.

किल्ल्याला भेट देण्याची वेळ-

किल्ले प्रतापगड (Pratapgad Fort)

प्रतापगडावर आजही शिवकाळातील नियम पाळले जातात त्यामुळे गडाचे दरवाजे हे सूर्योदयापूर्वी उघडतात आणि सूर्यास्तानंतर बंद केला जातो.

गडाच्या वाहन तळावरून आपण उतरल्यानंतर पुढे दक्षिणेला असलेला टेहळणी बुरूज उजव्या हाताला ठेवत सरळ जाणाऱ्या पायवाटेने थोड्याच वेळात तटबंदीमध्ये लपविलेल्या पश्चिमाभिमुख महादरवाजात येऊन पोहोचतो. महादरवाजाची रचना म्हणजे रायगडाची गोमुखी द्वार आहे त्याप्रमाणेच काहीशी आहे. शत्रूला गडावर येण्यासाठी या प्रवेशद्वारातून वळून आत यावे लागते म्हणजे जर एखादा बाहेरून बघत असेल तर त्याला गडाचा दरवाजा दिसणारच नाही. जेव्हा तो जवळ येईल तेव्हा त्याला दरवाजा दिसेल परंतु शत्रूला तिथे येऊन दरवाजा पर्यंत येण्यास लागणाऱ्या वेळात तटबंदी वरील सैनिक शत्रूला जायबंदी करतील. महाद्वार तोडण्यासाठी लाकडी ओंडके वापरू शकत नव्हते कारण तिथे वळण होते, तोफेचा गोळा डागला तर तो तटबंदीला लागणार दरवाजावर आघात होणे अशक्य!

किल्ले प्रतापगड (Pratapgad Fort)

महादरवाज्यातून आत गेले की आपल्या उजव्या हाताला आपल्याला टेहाळणी बुरुज लागतो. याच बुरुजाच्या बाजूने असलेल्या रस्त्याने आपण वर आलो आहे. हा टेहाळणी बुरुज चिलखती स्वरूपाचा असून शिवप्रताप बुरुज म्हणून ओळखला जातो. इतिहासाच्या पुस्तकावर किंवा चित्रांमध्ये असलेला हा बुरुज याची देही याची डोळा बघितल्याचा आनंद खूप वेगळाच असतो. ओठांमधून आपोआप छत्रपती शिवाजी महाराज की जय हे उद्गार नक्की निघतात! बुरुजावर जाऊन आपल्याला खाली असलेली अफजलखानाची कबर बघायला मिळते. आपल्या लोकांच्या कृत्यांमुळे तिथे जाण्यास बंदी आहे.

बुरुजावर जाऊन एक जोरदार शिवगारद देऊन महाराजांचा तो पराक्रम आठवून पुन्हा महाद्वाराकडे यायचे. महाद्वाराच्या डाव्या हाताने वर जाणाऱ्या पायऱ्यांनी भवानी मातेच्या मंदिराकडे जायचे. डाव्या हातास आपल्याला गडाचा जुना प्रवेश मार्ग व नगारखाण्याचे अवशेष बघायला मिळतात. पडझड झाल्याने हा मार्ग बंदच आहे. वाटेत उजव्या हातास आपल्याला महाराजांनी जलवयवस्थापणासाठी बांधलेला प्रशस्त असा बांधीव तलाव बघू शकतो. 

किल्ले प्रतापगड (Pratapgad Fort)

त्याच्यापुढे काही पायऱ्या चढून आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी जातीने लक्ष देऊन स्थापन केलेल्या स्फूर्तिदेवता आई भवानीच्या मंदिराजवळ येऊन पोहोचतो. मंदिरात आपल्याला मोबाईल किंवा कॅमेरा वापरण्यास परवानगी नाहीये. मंदिरात आपल्याला भवानीमातेची सालंकृत प्रसन्न मूर्ती आढळते. इतिहासात या मूर्तीविषयी आपल्याला पुढे माहिती कळेल. मूर्तीच्या शेजारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूजेतील असलेले स्फटिकाचे शिवलिंग बघायला मिळते. इथे आपल्याला एक तलवार देखील बघायला मिळते, ही तलवार म्हणजे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी शिवप्रताप प्रसंगी केलेल्या पराक्रमाची साक्ष आहे असे सांगीतले जाते. 

भवानी मातेचा आशीर्वाद घेऊन आपण पुढे भवानी हस्तकला केंद्राकडे जायचे. तिथे सर्व बघून पुढे गेल्यावर भवानी तलाव, तलावाचा चिलखती बुरुज आणि चोरदिंडी आपल्याला बघायला मिळते. हे सर्व पाहून आपण आल्या वाटेने मंदिराकडे येऊन बालेकिल्ल्याकडे जायला निघायचे.

किल्ले प्रतापगड (Pratapgad Fort)

मंदिराकडून बालेकिल्ल्याकडे जाण्यासाठी पायऱ्या आहेत. वाटेत आपल्याला दिसते ती मूर्ती समर्थ रामदासांनी स्थापन केलेली हनुमानाची मूर्ती आहे असे सांगितले जाते.

गडाचा बालेकिल्ला हा देखील तटबंदी आणि दरवाजाने मजबूत बनवलेला आहे. छोटेखानी परंतु वळणातून आत जावे लागेल असे प्रवेशद्वार आपल्याला इथे बघायला मिळते. प्रवेशद्वार ओलांडल्यानंतर आपण केदारेश्वर महादेवाच्या मंदिराजवळ येऊन पोहोचतो.मंदिराची जागा ही तशी भवानी मंदिरासाठी राजांनी निवडलेली, परंतु तिथे स्वयंभू शिवलिंग आढळण्याने तिथे महादेवाचे मंदिर बांधण्यात आले. मंदिराच्या समोर घडीव दगडात बांधलेली प्रशस्त अशी सदर बघायला मिळते. याच ठिकाणी राजांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले असावेत. न्यायनिवाडे, मसलती याच सदरेत झाल्या असाव्यात. 

केदारेश्वर मंदिराच्या पाठीमागे वाड्याचे अवशेष आपल्याला बघायला मिळतात, ते राजवाड्याचे असावेत असा अंदाज आहे. इथे फुलांच्या बागेच्या मध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बघायला मिळतो. हा अश्वारूढ पुतळा बघून त्याला वंदन करून आपण पुढे भटकंती सुरू करायची. पुतळ्याच्या शेजारी शासकीय विश्राम स्थान आहे. एका बाजूला आपल्याला गडाच्या बालेकिल्ल्याच्या तटबंदीवर जाण्यासाठी वाट आहे. 

किल्ले प्रतापगड (Pratapgad Fort)

जावळीचे खोरे ज्यात अफजलखान अर्धी लढाई हरलाच होता त्याचे विहंगम दृश्य आपल्याला तटबंदीवरुन फेरफटका मारताना समजते. आपल्याला या फेरीत पहिले लागतो राजपाहऱ्याचा दिंडी दरवाजा, नंतर रेडका बुरुज, यशवंत बुरुज आणि पुढे सूर्य बुरुज! हे सर्व बघितले म्हणजे आपली गडफेरी संपली. आल्या वाटेने परत महादरवाजा मधून वाहनतळावर आपण यायचे.


किल्ले प्रतापगडाचा इतिहास-

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात केल्यानंतर जावळी ताब्यात घेतली. जावळी मधील भोरप्या हा डोंगर महाराजांच्या समोर आला, डोंगराच्या आकाराने आणि जावळीच्या खोऱ्यामुळे प्राप्त दुर्गमतेने महाराजांचे लक्ष वेधून घेतले. कोकण आणि वाई हे दोन प्रांत जोडणाऱ्या रस्त्यावर मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या डोंगराचे महत्व दुर्गपती शिवरायांनी चांगले ओळखले. महाराजांनी अर्जोजी यादव यांना इथे किल्ला बांधण्याची आज्ञा दिली. त्यांनी फक्त दोन वर्षात किल्ला बांधून महाराजनांच्या स्वराज्याच्या स्वाधिन केला. 

गडावर भवानी देवीचे मंदिर असावे असे महाराजांना वाटत होते त्यामुळे त्यांनी सध्या असलेले केदारेश्वर मंदिर येथे जागा निवडली. परंतु त्या ठिकाणी शिवलिंग सापडल्याने तिथे केदारेश्वर महादेवाचे मंदिर बांधण्यात आले. भवानी मातेचे मंदिर हे त्यामुळे आपल्याला बालेकिल्ल्याच्या बाहेर दिसते. भवानी मातेची मूर्ती हे नेपाळ मधील गंडकी नदीच्या पात्रातील शाळीग्राम  या शिळे पासून बनवलेली आहे. 

प्रतापगड व त्याच्या परिसराचा फायदा महाराजाना जेव्हा अफजलखान वध झाला तेव्हा खूप झाला. अफजलखान वधपूर्वी महाराज इतर शत्रूंसमोर फक्त एका सरदाराचे पुत्र आणि बंडखोर होते परंतु अफजलखान वधाने संपूर्ण हिंदुस्थानात राजांचा स्वतंत्र राज्य उभारण्याचा प्रयत्न प्रकट झाला. 

1659 ते 1818 हा प्रदीर्घ कालखंड होता. यातील 1689 चा काही कालावधी सोडता गड शत्रूच्या हाती लागलाच नाही. 1818 नंतर साताऱ्याच्या गादीवर छत्रपती प्रतापसिंह यांना इंग्रजांनी बसवले. त्या काळात इंग्रजांचा हस्तक बाळाजी पंत नातू याने प्रतापसिंहांना प्रतापगड पाडावा असा सल्ला दिला. इंग्रज अधिकारी एल्फिस्टन कडे महाराजांनी मागणी केली की “ प्रतापगड देवीची जागा…न पाडावे” त्याने ही मागणी मान्य देखील केली.

आज आपल्याला जो सुस्थितीत गड दिसतोय त्याचे श्रेय छत्रपती प्रतापसिंह राजे यांना जाते आणि सध्या हा गड सातारा गादीच्या ताब्यात असल्याने त्यांना देखील जाते. 


राहण्याची व जेवणाची व्यवस्था-

गडावर अनेक उपहारगृह आहेत त्यामुळे तिथे तुम्ही जेवण करू शकता. गडावरील शासकीय विश्रामगृहात परवानगी मिळाली तर तुम्हाला थांबता येईल. अन्यथा पायथ्याशी असलेल्या हॉटेल्स चे मालक तुम्हाला टेंटची सुविधा देतील.






Post a Comment

0 Comments