ट्रेकिंगचा आनंद देणारा- भैरवगड (सातारा) / सारंगगड (Bhairavgad- Satara / saranggad)
कोकणातून महाराष्ट्र देशात यायचे म्हणले कि समोर उभा राहतो द्वारपाला सारखा सह्याद्री! माझ्या महाराष्ट्राचा, स्वराज्याचा आणि मराठी माय माऊलीचा खंबीर पाठीराखा, महाराष्ट्राची मान संपूर्ण जगभरात उंचावणारा सह्याद्री.. उंची बुलंद आणि बेलाग, कठीण खिंडी आणि निसर्गरम्य घाट माथे आणि वाटा... फक्त स्वराज्याच्या काळात नव्हे तर त्याच्याही आधी हा सह्याद्री आणि परिसर राखण्यासाठी अनेक गडकोट उभारले गेले. आपल्याला वनदुर्ग हि संकल्पना जास्त याच सह्याद्री मध्ये बघायला मिळते. आपल्याला वासोटा, प्रचीतगड माहित आहेत परंतु त्याच श्रेणीत येणारे, जंगलातून जाताना सूर्यप्रकाश देखील मुश्किलीने जिथे पोहोचतो अशा जंगलात वसलेले गड म्हणजे पालीचा किल्ला, जुंगटीचा किल्ला, जंगली जयगड आणि आजचा आपला भैरवगड! हि एक गडांची शृंखला बघण्याचे भाग्य आपले थोडे कमी म्हणावे लागेल, कारण सह्याद्रीला आता व्याघ्रप्रकल्प घोषित केले आहे, त्यामुळे पालीचा किल्ला आणि जुंगटीचा किल्ला यावर कोणाला सोडले जात नाही आणि सध्याच्या काळात जंगली जयगडाचा राबता हि कमी करण्यात आला आहे. म्हणजे आपल्याला नशिबात आणि भाग्यात जो भैरवगड शिल्लक आहे तो तरी आपण लवकर बघून यावं हाच सल्ला देईल.
किल्ल्याचे नाव- भैरवगड (सातारा) / सारंगगड
समुद्रसपाटीपासून उंची- ८७९ मीटर
किल्ल्याचा प्रकार- वनदुर्ग आणि गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी- ट्रेकर्स साठी उत्तम, मध्यम
ठिकाण- जुना वाघेना आणि पाथेच्या मध्ये
जिल्हा- सातारा
सध्याची अवस्था- ठीक
किल्ल्याला भेट द्यायला कसे जाल?
भैरवगड ऊर्फ सारंगगड ला जाण्यासाठी एकूण ६ वाटा आहेत.
१) हेळवाक - रामघळ मार्गे-
कोयनानगरच्या अलीकडे ५ किलोमीटर अंतरावर आपण हेळवाक हे गाव गाठायचे. गावातील नदीवरील पूल ओलांडून आपण उजव्या हाताने मळलेल्या पायवाटेने डोंगरावर चढाई सुरु करायची. थोड्या चढाईनंतर आपण कोंढावळ्याच्या धनगरवाड्याला पोहोचतो. येथून डोंगर उजवीकडे आणि ओढा आपल्या डाव्या हाताला ठेवत आपण समर्थ रामदास स्वामींच्या वात्सव्याने पावन झालेली "रामघळ" गाठायची. रामघळ हि बघण्यासारखी आहे. रामघळ बघून आपण वर जाणारा रस्ता पकडायचा. पाथरपुंज आणि जुना वाघेना हा मार्ग देखील येथून आहे पण त्याने गडावर पोहोचायला खूप जास्त वेळ लागतो. या वाटेने खूप जास्त दाट झाडी आणि जंगल असल्याने पायवाट मळलेली नाहीये. या वाटेने जायचे असल्यास वाटाड्या सोबत असलाच पाहिजे. परंतु या भागात वाटाडे खूप जास्त किमत सांगतात त्यामुळे ग्रुप मोठा असेल तरच या वाटेने जावे. तुमच्याकडे वन खात्याची परवानगी असेल तर पावसाळा सोडता भैरवगड पायथ्याच्या मंदिरापर्यंत हेळवाक पासून म्हणजेच या २० किलोमीटर अंतरासाठी कच्चा रस्त्याने जीपने येता येते.
भैरवगड वर आणि शेजारील भैरवनाथाच्या मंदिरात मुक्काम करायला बंदी घातलेली आहे, त्यामुळे या मार्गाने येणार कसे हा मोठा प्रश्न आहे. त्यात पावसाळ्यात जीप येत नाही आणि तुम्ही पायी आला तर जळवांचा त्रास होतो असे ट्रेकर्स सांगतात. वाट चुकण्याची भीती या मार्गाने तशी खूप जास्त त्यामुळे आपल्याला वाटाड्या हवाच असतो. धनगरवाडा मध्ये वाटाडे आहेत परंतु वाट दाखवण्यासाठी ते अडवून मोठी रक्कम मागतात.
२) दुर्गवाडी मार्गे-
या मार्गाने गडावर यायचे असेल तर चिपळूणला यावेल लागेल. चिपळूण हून डेरवण मार्गे दुर्गवाडी हे पायथ्याचे गाव गाठायचे. चिपळूण हून तुम्हाला पाहते ४ वाजता, ७:५० , ११:०० , २:१५ आणि मुक्कामी ४:४५ ची बस आहे. दुर्गवाडी पर्यंत येण्यास साधारणतः १ तास लागतो. या दुर्गवाडीच्या वरच्या बाजूला असलेल्या जंगलातून वाट थेट गडावर जाते. वाट तशी सरळ जरी असली तरी गडावर पोहोचण्यास दमछाक करत ३ तास लागतात. वाटेत पाण्याचा कोणताही स्त्रोत नाहीये. गव्हारे-गावळ पोती मार्गे येणारा मार्ग देखील या वाटेलाच येऊन मिळतो.
दुर्गवाडी वरून ७:३० , ८:०० , ९:३० आणि संध्याकाळी ४:०० वाजता चिपळूणला जाणाऱ्या बस आहेत.
३) गोवळ पाती मार्गे-
मुंबई गोवा महामार्गावर आसुर्डे फाटा आहे, तिथून डावीकडील रस्ता हा गोवळ पाती गावापर्यंत जातो. हे अंतर जवळपास 22 किमी आहे. यातील शेवटचे काही किलोमीटर हे कच्चा रस्ता आहेत. गावाच्या वर असलेल्या पठारापर्यंत जाण्यासाठी गावकऱ्यांनी पायऱ्या बांधलेल्या आहेत. पठारावर पोहोचायला गावातून १:३० लागतो आणि इथून पुढे खड्या चढणीच्या वाटेने तुम्ही २ तासात गडावर पोहोचता. हा मार्ग पायथ्यापासून ३:३० चढाईचा आहे.
४) गव्हारे मार्गे-
याच मार्गाने पावसाळा नसेल तर जीपच्या सहय्याने जाता येते. तसेच जरी जीप नसेल तर गडावर पोहोचायला गावातून ३ तास लागतात.
५) चिरंबे-नाव- कोळणे मार्गे-
या मार्गे देखील पाथरपुंज गाठून जीपच्या कच्चा रस्त्याने गडाकडे जाता येते.
६) मोरगिरी मार्गे-
परिसरात पवनचक्क्यांच्या ट्रक्स साठी बनवण्यात आलेला एक कच्चा रस्ता आहे. या मार्गे पाटण-मोरगिरी-धावडे-गोकुळ-गोठणे-पाथरपुंज असा प्रवास स्वतःच्या मोटारसायकल अथवा जीपने होऊ शकतो.
किल्ल्याला भेट देताना घ्यावयाची काळजी?
२०१२ साली भैरवगडच्या आजूबाजूचे अभयारण्य हे टायगर रिझर्व म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे हेळवाक कडून भैरवगड कडे जाणाऱ्या आणि पाथरपुंज कडून इथे देखील कच्च्या रस्त्यांवर जंगल म्हणजेच वन विभागाने चौक्या बसवलेल्या आहेत. त्यामुळे वन विभागाची लेखी परवानगी घेऊनच आपल्याला पुढे जावे लागते. हा संपूर्ण भाग वनविभागाच्या अखत्यारीत येत असल्याने इथे मुक्तपणे वावरता येत नाही. आपल्याला अगोदर परवानगी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी कोयना वनखात्याच्या ऑफिसचा क्रमांक आहे (०२३७२) २८४०९१, जर परवानगी शिवाय अभयारण्य शेत्रात प्रवेश केला तर रुपये ५०,००० दंड किंवा ३ वर्षाची शिक्षा होऊ शकते.
किल्ल्याची वेळ-
कोणत्याही ऋतूत किल्ल्यावर जाता येत असले तरी देखील वन विभाग सुरक्षेच्या दृष्टीने पावसाळ्यात परवानगी देत नाही. याशिवाय ३१ डिसेंबर, १ जानेवारी, बुद्धपौर्णिमा आणि त्याच्या आधीचा दिवस या दिवसांना तुम्हाला परवानगी मिळत नाही. यातील एक कारण म्हणजे प्राणीगणना सुरु असते.
आपण एका नैसर्गिक खिंडीतून पुढे गेलो की आपल्याला खिंडीच्या उजव्या हाताला खोल दरी दिसते. आपण गर्द झाडींनी झाकलेली ही खिंड बघून पुढे जाऊ शकतो. पुढे आपण भैरवनाथ मंदिराजवळ येऊन पोहोचतो. घाटमाथ्याच्या अगदी बाहेरील बाजूला हे मंदिर असून भैरवगड एका डोंगराधारेने या मंदिराला जोडलेला आहे.
२०१० साली भैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. भटके म्हणतात की जुने दगडातील मंदिर हे बघण्यासारखे होते परंतु आता काँक्रीट चे हे देऊळ बघून जुन्या वैभवाला मुकलो असे वाटते. मंदिरात ३ मुर्त्या आहेत. भैरवनाथाची हातात नाग असलेली मूर्ती लक्षवेधक आहे. यासोबत श्री तुकाईदेवी आणि वाघजाई देवीची देखील मूर्ती आहे. मंदिराच्या समोर महादेवाचे छोटेखानी मंदिर आणि तुळशी वृन्दावन आहे. मंदिराच्या परिसरात काळ्या कातळावर शिवरायांचा पुतळा आहे. ईथे एक झाडाखाली पिण्यायोग्य पाण्याचे कुंड आहे.
पुढे आपण दरीच्या माथ्यावरून गेलो असता एक सुस्थितीत असलेला गोलाकार बुरुज आपल्याला बघायला मिळतो. थोडे अंतर पुढे गेलो की गडाचा भग्न दरवाजा लागतो. समोरच्या पायवाटेने पुढे गेलो की आपण गडाच्या दुसऱ्या टप्प्यावर पोहोचतो. इथे पश्चिम कड्याच्या पोटामध्ये गडावरील एकमेक पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. कारवीच्या मधून कमी मळलेल्या पायवाटेने आपण गडाच्या माथ्यावर येतो. ही वाट जास्त वापरात नसल्याने बऱ्याचदा चुकण्याची शक्यता असते. सर्वोच्च माथ्यावर म्हणजेच बाले किल्ल्यावर थोडेफार तटबंदीचे अवशेष आणि काही घरांचे जोते बघायला मिळतात.
माथ्यावरून चोहोबाजूंनी आपल्याला प्रदेश बघायला मिळतो. दक्षिणेला असलेला प्रचितगड लक्ष वेधून घेतो. गडफेरीला एक तास जातो.
आपली गडफेरी आलेल्या वाटेने पुन्हा
निघत पूर्ण करता येते. वनविभागाच्या परवानगी ने तुम्हाला तिथे
मुक्काम करता येऊ शकतो, परंतु ते ही अडचणीच्या वेळी अन्यथा
वनविभाग परवानगी देत नाही.
भैरवगड / सारंगगड इतिहास-
भैरवगड हा किल्ला १२ वया शतकात शिलाहार राजा भोज याने
बांधला असावा असे म्हणले जाते. पुढे १४५३ मध्ये लढाई करून मलिक उत्तुजार
ने ताब्यात घेतला. याच गडाला इतिहासात सारंगगड या नावाने
देखील ओळखले जाते. छत्रपती शिवरायांनी १६६१ मध्ये दक्षिण
कोकण जिंकण्यासाठी काढलेल्या मोहिमेत श्रुंगारपूर जिंकले. त्याच काळात हा सारंगगड स्वराज्यात दाखल झाला असावा. मराठा काळात या गडावर साताऱ्याची शिबंदी होती असे म्हणतात. मराठा साम्राज्याच्या सोबत इंग्रजांच्या शेवटच्या युद्धात २३ मे १८१८ रोजी हा गड
ब्रिटिशांनी ताब्यात घेतला.
राहण्याची व जेवणाची सोय-
या गडाला भेट देण्यासाठी दोन दिवस कालावधी गरजेचा असतो परंतु गडावर किंवा मंदिरात आता राहू देत नसल्याने
ते शक्य नाहीये. पहाटे लवकर निघून दिवस मावळण्याच्या
आत गडफेरी आपल्याला पूर्ण करावी लागते.
जेवणाची आणि राहण्याची सोय हेळवाक, मोरगिरी, पाथरपुंज, धनगरवाडा या गावात वाटाड्यांच्या आणि
गावकऱ्यांच्या घरात होऊ शकते.
0 Comments