पट्टागड/ पट्टाकिल्ला उर्फ विश्रामगड (Patta Fort or Vishramgad)
छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर एखाद्या गडावर जास्त काळ वास्तव्य केलेले असेल असे घडले नाही. रायगड, राजगड यासारखे मानाचे किल्ले या यादीतून तुम्ही वगळू शकता परंतु अशा महाराजांच्या विश्रामाच्या किल्ल्यांमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर नाशिक सीमेवरील पट्टागडला देखील हे भाग्य लाभले आहे.
गडाचे नाव- पट्टागड
समुद्रसपाटीपासूनची उंची- 4562 फूट
गडाचा प्रकार- गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी- सोपी
डोंगररांग- कळसुबाई, सह्याद्री
जवळचे गाव- पट्टावाडी, कोकणवाडी
जिल्हा- अहमदनगर
गडावर कसे पोहोचाल?
जर तुम्ही मुंबई वरून आले तर तुम्हाला इगतपुरी कडे यावे लागेल. इगतपुरी वरून दोन मार्गे आपण जाऊ शकतात. इगतपुरीहून घोटी मार्गे सरळ टाकेदला यावे, टाकेदला आल्यानंतर तेथून कोकणवाडी पर्यंत जाण्यासाठी जीप सेवा आहे. टाकेद पासून कोकणवाडी हे अंतर जवळपास पाऊण तासांचे आहे. कोकणवाडी ते पट्टावाडी हे अंतर अर्ध्या तासाचे आहे, पट्टावाडी हे गाव पट्टागडाच्या पायथ्याचे आहे. इथून किल्ल्याच्या माथ्यावर जाण्यासाठी जवळपास अर्धा तासाचा कालावधी लागतो.
इगतपुरी वरून इगतपुरी भगूर बसने कडवा कॉलनी ला जायचे. कडवा कॉलनी मधून निनावी गावात यायचे, या निनावी गावातून एक वाट औंढा किल्ल्याकडे जाते तर दुसरी वाट पट्टागडाकडे जाते.
गडावर जाताना घ्यावयाची काळजी:
गडावर आपल्याला पाण्याची टाकी मिळतात, परंतु स्वच्छता नसल्याने पाण्याची व्यवस्था करावी लागेल.
टाकेदाला आलेले आहात तर टाकेद गावशेजारी सर्वतीर्थ नावाचे एक क्षेत्र आहे. रामायणातील घटनांचा संबंध या गावाशी आहे. जेव्हा रावण सितामाईला पळवून नेत असताना या मार्गाने त्यांना जटायूने विरोध केला. यावेळी रावणाने जटायूचे पंख छाटल्याने तो खाली पडला. सीतेच्या शोधात असलेले राम लक्ष्मण यांना जटायू घायाळ आढळला. याच जटायूला पाणी पाजण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी बाण मारून इथे पाणी काढले. याच ठिकाणी जटायूचे सुरेख मंदिर व सर्वतीर्थ नावाचे पाण्याचे कुंड बांधलेले आहे. या कुंडाचा अध्यात्मिक आनंद आपण घेऊन पुढे जावे.
पट्टागडावर जास्त काही ऐतिहासिक स्थळे किंवा इमारती नाहीत परंतु जे आहे ते सुस्थितीत आणि उत्कृष्ट आहे. पट्टावाडी मध्ये फक्त 15 ते 20 आदिवासींचे घरे आहेत. येथेच गडाच्या अगदी बरोबर पायथ्याला एका दगडी कट्टयावर ऐतिहासिक तोफ ठेवलेली आहे.
गडावर एक महाराज श्रद्धास्थान असल्याने गावकऱ्यांनी तिथे जाण्यासाठी प्रशस्थ वाट बनवलेली आहे. या वाटेने चढाई सुरू केल्यावर आपण 20 मिनिटांमध्ये कातळात खोदलेल्या दोन गुहांपर्यंत येऊन पोहोचतो. या दोन्ही गुहा आता दरवाजे बसवून बंद केलेल्या आहेत, यातील एक गुहा ही लक्ष्मणगिरी महाराजांची समाधी आहे. ह्या समाधीचे प्रवेशद्वार फक्त पौर्णिमेच्या दिवशीच उघडले जाते. या गुहेच्या वर कातळकोरीव पायऱ्यांमधून जाऊन आपण पट्टाई देवीच्या मंदिराजवळ येऊन पोहोचतो. या मंदिरच्या गाभाऱ्यात आपल्याला पट्टाई देवीची सिंहारूढ झालेली पूर्वाभिमुख मूर्ती बघायला मिळते.
येथे जवळच कातळात खोदलेली दोन प्रशस्त टाकी आहेत . या टाक्यांपासून उत्तरेकडे थोडे पुढे चालत गेल्यावर पट्टा किल्ल्याचा आजही सुस्थितीत असलेला ' दिल्ली दरवाजा ' नावाचे प्रवेशद्वार लागते . या दरवाज्यातून उतरणारी पायवाट तिरडे गावास जाते . आपण हा दिल्ली दरवाजा पाहून परत पट्टाई मंदिराजवळ येऊन ऊर्वरीत गड चढाईला सुरूवात करायची . पट्टाई मंदिरापासून १५ मिनिटांत आपण पट्टागडाच्या माथ्यावर येऊन पोहोचतो . पट्टागडाच्या माथ्याचा विस्तार प्रचंड असून त्याच्या दोन - तीन टप्प्यांत पसरलेल्या डोंगरभुजा बऱ्याच लांब आहेत . त्यामुळे संपूर्ण गड व्यवस्थित पाहण्यास पाच ते सहा तास आपल्या हाती असणे गरजेचे ठरते .
गड प्रवेश केल्यानंतर आपण समोरच दिसणाऱ्या भव्य अंबरखान्याच्या पुरातन वास्तूजवळ पोहोचायचे . काळ्या पाषाणात बांधलेल्या या भव्य इमारतीस एका पाठोपाठ एक असे तीन घुमट असून डोंगर उतारामुळे ही वास्तू तीन टप्प्यात उभारलेली आहे . या इमारतीच्या उत्तरेकडील उपद्वारावर पायात हत्ती चिरडणारे एक व्याघ्रशिल्प आपणास पाहायला मिळते . पट्टा गडावरील ही अंबरखान्याची सुस्थितीतील इमारत म्हणजे विश्रामगडाचा एक अनमोल ठेवाच आहे . अंबरखान्याच्या या इमारतीशेजारीच एक इतिहासकालीन समाधी व तिच्या शेजारीच एक पिण्यायोग्य पाण्याचे टाके आहे . ते पाहून आपण गडाच्या सर्वोच्च माथ्यावर पोहोचायचे . सर्वोच्च माथ्यावर गडाचा एकूणच प्रचंड आकार व विस्तार आपल्या लक्षात येतो .
पट्टा किल्ल्यास बऱ्याच ठिकाणी तटबंदी व याच्या प्रत्येक सोंडेच्या टोकाशी संरक्षणाच्या दृष्टीने प्रत्येकी एक उत्तम बुरूज बांधलेला आहे . हे बुरूज पाहत - पाहत आपण गडाच्या उत्तर टोकाजवळ असणाऱ्या गुहेजवळ पोहोचायचे . एकूण पाच दालने खोदलेली ही गुहा जरी भव्य असली तरी ती मुक्कामयोग्य नाही . या गुहेच्या बाहेरच उघड्यावर पाण्याची चार टाकी असून ती टाकी पाहून आपण उत्तर टोकाजवळ जायचे . येथे एक बुरूज व छोटा दरवाजा असून तो पार करून पुढे गेल्यावर परत एक माची लागते . या बाजूस आकाशात घुसलेला एक कुरेबाज सुळका दिसतो , तो आहे - औंढा किल्ला . हे दोन किल्ले एकमेकांजवळच असल्यामुळे यांना औंढा - पट्टा या जोड नावानेच संबोधले जाते .
आपण गडाचे हे उत्तर टोक पाहून गडाच्या दक्षिणेकडे चालायला सुरूवात करायची . या टोकावर परत पाण्याची टाकी आपणास पाहायला मिळतात . येथून पश्चिमेकडे पाहिल्यानंतर दूर आसमंतात कळसूबाईचे शिखर , अलंग - मदन - कुलंग या कुर्रेबाज किल्ल्यांचे त्रिकूट , कडवा नदीचे खोरे असा बराच लांबवरचा मुलूख आपल्याला पाहायला मिळतो . पट्टा गडाची फेरी करताना या गडाच्या कातळकड्यांचा कमरपट्ट्यांसारखा आकार ४ ते ५ ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो . कदाचित या अर्धगोलाकार आकारामुळेच या गडास ‘ पट्टा ' हे नाव पडले असावे .
सर्व गड व्यवस्थित पाहून झाल्यावर परत आपण अंबरखान्याजवळून जाणाऱ्या वाटेने गड उतरायचा . पट्टा गडावर मुक्कामयोग्य अशी कोणतीच जागा नसून अंबरखाना व इतर गुहा जनावरांनी घाण केल्यामुळे अस्वच्छ बनल्या आहेत . तसेच इतक्या मोठ्या गडावर कोठेही झाडे नसल्यामुळे सरपणाचादेखील तुटवडा जाणवतो . त्यामुळे दुर्गयात्रींनी प्रसंग आल्यास गडपायथ्याच्या कोकणवाडीत मुक्काम करावा .
पट्टा - ओंढा किल्ल्याचा ट्रेक एकत्रित करण्यासाठी दोन दिवसांचा अवधी हाताशी असणे गरजेचे ठरते . असा हा पट्टा ऊर्फ विश्रामगड थोडा आडबाजूला असला तरी दुर्गप्रेमींनी शिवरायांची स्मृती जागविण्यासाठी एक वेळ आवर्जून पाहिला पाहिजे .
गडाचा इतिहास
पट्टागडाचे बांधकाम हे बहमनी सल्तनतच्या काळात झाले. इ.स. 1347 ते इ.स. 1490 या काळात किल्ल्याचे बांधकाम झाले असावे. बहमनी सल्तनतीनंतर गडाचा ताबा हा महादेव कोळी जमातीकडे गेला होता. बहमनी सत्तेचे तुकडे झाल्यानंतर हा किल्ला निजामशाही कडे आला व पुढे इ.स. 1627 मध्ये मोघलांनि पट्टागड जिंकून घेतला.
पट्टागडाच्या इतिहासावर नजर टाकल्यास हा किल्ला इ . स . 1671 मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी मोगलांकडून जिंकून स्वराज्यात सामील केला असे आढळते . पुढे जालनापूरच्या लुटीनंतर राजे काही काळ या गडावर विश्रांतीसाठी थांबले होते . शिवाजी महाराज 16 नोव्हेंबर 1679 रोजी जालण्याची लूट करून परतत असताना मोगल सरदार रनमस्तखान महाराजांवर चाल करून यायला निघाला. यावेळी महाराजांच्या समवेत भरपूर खजिना लूट होती आणि लांबच्या प्रवासाने मावळे थकलेले होते. अशा वेळी युद्ध करणे हा पर्याय नव्हता त्यामुळे महाराजांची आणि सैन्याची सुरक्षित पट्टागडावर पोहोचण्याची व्यवस्था ही बहिर्जी नाईक यांनी केली. बऱ्याच दिवसांची धावपळ आणि दगदगीने महाराज व सैन्य थकले होते त्यामुळे महाराजांनी पट्टागडावर 15 दिवस विश्रांती घेतली. ज्या पट्टागडावर महाराजांना संकटाच्या काळात विश्रांती मिळाली त्या गडाचे नामकरण महाराजांनी विश्रामगड असे केले. पुढे अवघ्या पाच महिन्यांत स्वराज्याच्या अखंड भास्करचा अंत झाला त्यामुळे शेवटच्या काळात विश्राम घेतलेल्या विश्रामगडाला महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे व हे अनोखे वैभव जपण्याचे काम पट्टा गडावर झालेले आहे.
यानंतर इ . स . 1685 च्या फेब्रुवारी महिन्यात छ . संभाजी महाराजांचे सरदार रूपाजी भोसले मोगल मुलखात शैमान घालण्यासाठी याच किल्ल्यावरून बाहेर पडले . आलमगीरच्या वावटळीत हा किल्ला मातबरखान या सरदाराने 11 जानेवारी , 1688 ला मध्यरात्रीच्या सुमारास तटाला दोर लावून जिंकून घेतला व भगूरचा ठाणेदार गोविंदसिंग याची या गडाचा किल्लेदार म्हणून नेमणूक केली . पुढे ब्रिटिशांविरुद्धच्या स्वातंत्र्ययुद्धात अनेक क्रांतिवीर या किल्ल्याच्या आश्रयास येऊन राहत होते . त्यामुळे चिडून इ . स . 1819-20 मध्ये कॅप्टन मॅकिन्टॉशने गडावरील अनेक इमारती उद्ध्वस्त केल्या .
0 Comments