Ticker

6/recent/ticker-posts

२९ वर्षे मुघलांच्या कैदेत राहिल्यावर महाराणी येसूबाई यांचा मृत्यू कसा झाला? ।। Maharani Yesubai Death

२९ वर्षे मुघलांच्या कैदेत राहिल्यावर महाराणी येसूबाई यांचा मृत्यू कसा झाला?


श्री सखी राज्ञी जयति महाराणी येसूबाइंच्याचरणी मानाचा मुजरा!

सुविद्य, सुसंस्कृत, कर्तव्यदक्ष, राजकारण कुशल अशा महाराणी येसूबाई साहेब यांनी १६८० ते १७३० या कसोटीच्या काळात स्वराज्यासाठी अगदी महत्वाचे योगदान दिलेले आहे. पिलोजीराव राघोजीराव शिर्के यांच्या घराण्यात जन्मलेल्या जिउबाई अथवा राजसबाई म्हणजेच महाराणी येसूबाई साहेब होय. अंदाजे इसवी सन १६६१ ते १६६५ याच्या दरम्यान येसूबाई साहेबांचा विवाह हा छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र धर्मवीर संभाजी महाराज यांच्या सोबत झाला. लग्नाच्या वेळी येसूबाईंच वय हे जेमतेम ६ ते ७ वर्ष होत. त्यामुळे त्यांच्या आयुष्याची जडणघडण हि मासाहेब जिजाउंच्या देखरेखीखाली झाली. या जडणघडनीचा एकंदरीत परिणाम हा महाराणी येसूबाई यांच्या जीवनावर झालेला दिसतो. रणांगणावर त्यांचे पराक्रम नसले तरी त्यांचे राजकारण आणि स्वराज्यासाठी सदैव तत्परता त्यांच्या आयुष्यात दिसून येते. 

छत्रपती शिवरायांच्या अनुपस्थिती मासाहेब जिजाऊ संपूर्ण राज्यकारभार सांभाळत असत त्याचप्रमाणे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या अनुपस्थितीत महाराणी येसूबाई स्वराज्याची धुरा चपखलपणे सांभाळत असत. राज्यकारभार चालवण्यासाठी महाराणी येसूबाई यांच्या नावाची मोहर धर्मवीर संभाजी महाराजांनी बनवून घेतलेली होती. त्या मोहरेवरील मजकूर हा असा होता की, "श्री सखी राज्ञी जयति"! 

छत्रपती संभाजी महाराजासारख्या निखाऱ्याला पदरात बांधून त्यावर मायेची पांघरून घालणाऱ्या त्या पतिव्रता होत्या. सदैव पायाला वादळ असणारे संभाजी महाराज संपूर्ण महाराष्ट्राला जिंकण्यासाठी गरुडभरारी घेत होते, तेव्हा रायगडावरून स्वराज्याची राखण करणाऱ्या त्या कुशल राजनेता होत्या. गडावर येणारे वाद- तंटे त्या स्वतः सदरेवर बसून हाताळत असत आणि शत्रूच्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी त्या रणनीती देखील आखत असत.

इ.स. १६८९ मध्ये संभाजी महाराजांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीला वयक्तिक दृष्ट्या दुख्खाला बाजूला सारून त्या खंबीरपणे स्वराज्यासाठी उभ्या राहिल्या. राजाराम महाराज व शंभूराजांचे पुत्र थोरले शाहू दोन्ही स्वराज्याचे वारसदार एकाच वेळी औरंगजेबाच्या हाती सापडू नये म्हणून त्यांनी स्वतच्या मुलाला म्हणजे शाहुना आपल्या जवळ ठेऊन राजाराम महाराजांना रायगड सोडून जाण्यास सांगितले. बाहेरून रायगडास मदत करा आणि प्रसंगी जिंजीकडे जा असे राजाराम महाराजांना सुचवले. महाराणी येसूबाई स्वतः रायगड लढवत होत्या, परंतु पुढे जाऊन रायगड लढवणे अशक्य झाल्याने त्यांनी स्वतःला आणि आपल्या मुलाला मोघलांच्या हवाले केले.

आयुष्याची 27 वर्षे त्यांनी मोघलांच्या कैदेत घालवली. या काळात अनेक अडचणी त्यांना आल्या आणि त्या सर्व अडचणी त्यांनी धैर्याने सोडवल्या. इ.स. १७१९ च्या सुमारास त्या दिल्लीहून दक्षिणेत परत आल्या. दक्षिणेत स्वराज्याची झालेली सातारा आणि कोल्हापूर ही शकले त्यांनी पहिली, आपापसातील वादांमुळे परकीय सत्ता आपल्या वर कसे राज्य करतात हे त्या अगोदरपासून पाहत आल्या होत्या. त्यामुळे त्यांनी १७३० च्या आसपास वारणेचा तह घडवून आणला. हा तह संभाजी राजे व शाहू महाराज यांच्या मध्ये घडवून आणला. त्यानंतर थोड्याच दिवसात त्यांचे देहावसण झाले, याचा उल्लेख कोल्हापूरचे संभाजी महाराज यांच्या पत्रातून कळतो. सातारा येथील संगम-माहुली येथे त्यांचे अंतिम संस्कार झाले. त्यांची समाधी नक्की कुठे आहे यावर आजही संभ्रम आहेत परंतु इतिहासकार जयसिंगराव पवार यांच्या मते संगम माहुली येथे माहुली नदीच्या काठी चौथरा हीच महाराणी येसूबाईंची समाधी होय. 

महाराणी येसूबाई यांचे जीवन हे संपूर्णपणे स्वराज्यासाठी आणि आपल्या रयतेसाठी वाहिले होते. संभाजी महाराज असताना त्यांच्या विरोधातील कट कारस्थाने उधळून लावून आपल्या पतीची खंबीर पाठराखण करणाऱ्या आणि कोल्हापूर सातारा विभागलेल्या गादयाना पुन्हा एकत्र आणण्याचा सफल प्रयत्न करणाऱ्या या महाराणी येसूबाई माँसाहेब!

परंतु खंत एकच वाटते , जे समाधीस्थळ सध्या वाटते आहे तिथे देखील आजही पणती देखील लावली जात नाही किंवा साधा एक चिरा देखील लावला गेला नाहीये. नसुद्या ती महाराणी येसूबाईंची समाधी परंतु कमीत कमी त्यांच्या प्रति आपली सदभावना आणि दिलगिरी व्यक्त करण्याची जागा तरी बनवुयात का? बघा विचार करा आणि आपले विचार खाली कमेंट नक्की करा!


Post a Comment

0 Comments