मांसाहेब जिजाउंचा मृत्यू कुठे आणि कसा झाला?
पारतंत्र्याचा काळ होता, एकाच वेळी सुलतानी संकटे महाराष्ट्राच्या आणि भारत भूमीच्या उरावर थयथयाट करत होती. एकाच वेळी आसमानी आणि सुलतानी संकटे महाराष्ट्र सहन करत होता. मंदिरे उध्वस्त केली जात होती, आय बहिणींची अब्रू डोळ्यांदेखत लुटली जात होती, उभ्या पिकांची नासाडी शेतकरी बघत होता, गोरगरीब रयतेची खुलेआम कत्तल केली जात होती. अशा वेळी या महाराष्ट्र रक्षणासाठी राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ नावाच्या सह्याद्रीच्या वाघिणीने छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण जगाच्या रक्षणासाठी एका तेजस्वी ताऱ्याला जन्म दिला.
शिवरायांच्या लहानपणा पासून त्यांना रयतेच्या रक्षणाचे बाळकडू पाजून त्यांच्याकडून रयतेच्या रक्षणासाठी स्वराज्य स्थापनेची शपथ घेणाऱ्या व महाराजांवर गोरगरिबांचे कल्याण व आया बहिणींची अब्रू सर्वात महत्वाची हे संस्कार करणाऱ्या मासाहेब जिजाऊचे कार्य अवघा महाराष्ट्र कधीच विसरू शकत नाही.
बुलढाणा जिल्ह्यातील सिंधखेडचे लखुजीराव जाधव व म्हाळसाबाई यांच्या पोटी १२ जानेवारी १५९८ साली जिजाउंचा जन्म झाला. अत्यंत कमी वयात म्हणजेच १६०५ साली दौलताबाद येथे शहाजीराजांसोबत त्यांचा विवाह झाला. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले हे आपण जितक्या अभिमानाने सांगतो तितक्याच अभिमानाने आपल्याला हे देखील सांगावे लागते कि जर स्वराज्य जननी राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ नसत्या तर हे स्वराज्य उभेच राहू शकले नसते.
परकीय सत्तांच्या जुलुमातून गोरगरीब रयतेची सुटका करायची असेल तर स्वराज्य हा एकमेव पर्याय आहे हे मासाहेब जिजाऊनि शिवरायांच्या मनावर बिंबवले. छत्रपती शिवरायांना त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक महत्वाच्या प्रसंगी मासाहेब जिजाऊनचा सल्ला खूप उपयोगी पडे. शिवराय ज्यावेळी एखाद्या मोहिमेवर असतील त्यावेळी राज्यकारभार व न्यायदानाची सर्व जबाबदारी मासाहेब जिजाऊ स्वतः पार पाडत.
गोरगरीब रयतेच स्वताच हक्काचं राज्य उभे रहावे, शेतकऱ्यांच्या कष्टाला न्याय मिळावा, आयाबहिणीच्या अब्रूचे रक्षण व्हावे यासाठी हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावे हेच मासाहेबांच स्वप्न होत.
जानेवारी १६६४ साली शहाजीराजांचा मृत्यू झाला, त्यावेळी मासाहेब जिजाऊ सती जाणार होत्या परंतु शिवरायांच्या आग्रहाखातर त्या सती गेल्या नाहीत. सती प्रथेला लाथाडून त्या स्वराज्यासाठी शिवरायांना अखंडपणे साथ देत राहिल्या. आपल्या मातेच्या स्वप्नासाठी, या रयतेच्या आग्रहाखातर पाचही जुलमी सत्तांच्या छाताडावर पाय देऊन अखेर ६ जून १६७४ साली शिवरायांचा रायगडावर राज्याभिषेक संपन्न झाला. शेकडो वर्षांचा पारतंत्र्याचा इतिहास आज नष्ट झाला, रयतेने जल्लोष केला.
शिवराज्याभिषेक हा जणू मासाहेबांच्या आयुष्यातील सर्वोच्च सुवर्णक्षण होता. जणू या क्षणाचीच मासाहेबांनी आयुष्यभर वाट पहिली होती, मासाहेब धन्य झाल्या. आपला पुत्र छत्रपती झाला याचा आनंद त्यांना नव्हता तर या रयतेच राज्य स्वराज्य उभे राहिले याचा त्यांना आनंद होता.
राज्याभिषेकानंतर मासाहेब जिजाऊ जणू आनंदाने डोळे मिटायला तयार होत्या. राज्याभिषेकानंतर मासाहेब जिजाऊंची तब्ब्येत खालावली होती. अखेरीस राज्याभिषेकानंतर अवघ्या १२ दिवसांनी, म्हणजेच १७ जून १६७४ साली रायगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या पाचाड या गावी मासाहेब जिजाऊंनी अखेरचा श्वास घेतला.
राष्ट्रमाता स्वराज्य जननी मासाहेब जिजाऊंना गर्वाने मराठी परिवाराकडून मानाचा मुजरा!
0 Comments